कृषि संजीवनी सप्ताहाचे यशस्वी आयोजन: कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावरहरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त, ०१ जुलै रोजी साजरा होणाऱ्या कृषि दिनाच्या अनुषंगाने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांनी दि. ०१ ते ०७ जुलै दरम्यान “कृषि संजीवनी सप्ताह” साजरा केला. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर, अहमदपूर, वर्धा तालुक्यातील निमगाव (मबाने) व आमला, देवळी तालुक्यातील बोपापूर-दिघी व खरडा या गावांमध्ये हा सप्ताह आयोजित करण्यात आला. मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि मा. संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे हा होता.खरीप हंगामा दरम्यान अल-निनो हवामाना नुसार पिक व्यवस्थापन विषयी भर देत पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना केले.खरीप हंगाम दरम्यान सोयाबीन, कपाशी व तूर पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी कृषिविद्या विषयतज्ञ डॉ भारती तिजारे यांनी तर कीड व रोग नियंत्रण, जैविक खतांचा उपयोग या विषयी पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ निलेश वझिरे यांनी मार्गदर्शन केले. शेतीसोबतच कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय देखील अधिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग आहे तसेच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी व जनावरांच्या लसीकरणाचे महत्व याविषयी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ सचिन मुळे यांनी मार्गदर्शन केले. पीक पेरणी करताना रुंद वरंबा- सरी चा उपयोग केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो व दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते अशी माहिती कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ सविता पवार यांनी दिली. रोजच्या आहारात ताज्या भाज्यांमुळे शरीरास भरपूर जीवनसत्वे व खनिजे मिळतात. या दृष्टिकोनातून महिलांना घरच्या घरी आठवड्याच्या सात प्रकारच्या भाज्या मिळाव्या म्हणून परसबाग लावणे आवश्यक आहे अशी माहिती गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ प्रेरणा धुमाळ यांनी दिली.सदर साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. कृषि संजीवनी सप्ताह चे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर शास्त्रज्ञांनी भेटी देऊन पिकांची पाहणी केली व उपाययोजना सुचविल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. दीपक खाडे, श्री. विनोद दांडगे, श्री. सचिन वडतकर, कु. प्रियंका टाकमाडे, श्री अरविंद देवतळे, कु. शिल्पा हिरवरकर, कु. चौधरी, सौ. नीता होरे, श्री अक्षय धुमाळ, श्री वैभव चौधरी तसेच गावातील शेतकरी बंधू, भगिनी यांनी मोलाचे योगदान दिले.




