शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढवावे: ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ चा यशस्वी आयोजन


  केंद्रीय कृषी मंत्रालय व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या वतीने वर्धा जिल्ह्यात दिनांक २९ मे ते १२ जून, २०२५  या दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.  या अभियानाचे उद्दिष्ट खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच या दरम्यान विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पिकांची निवड, शेती व संतुलित खतांचा वापर यावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन तसेच या व्यतिरिक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले.
    सदर अभियान भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बजाज कृषि महाविद्यालय व इफको, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. दि १२ जून रोजी या अभियानाचा समारोप देवळी तालुक्यातील बोपापुर येथे करण्यात आला.  
विकसित कृषि संकल्प अभियाना दरम्यान शास्त्रज्ञांनी वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ९० गावातील शेतकऱ्यांपर्यंत खरीप पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पोहचविले असे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्ताविका दरम्यान सांगितले तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील उपलब्धीनचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद संस्था, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, आत्मा व कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्ताने अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. शेतकऱ्यांनी शेती सोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुघ व्यवसाय करून अधिक उत्पन्न घ्यावे असे मार्गदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास अतकरे यांनी केले.
     आत्माच्या उपसंचालिका कु. राणी गायकवाड यांनी शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
    विकसित कृषि संकल्प अभियाना द्वारे प्रयोगशाळेतील विकसित तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन पोहचविले ज्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामातील पीक उत्पन्न वाढीकरिता सह्यय होईल अशी माहिती नागपूर कृषि महाविद्यालय येथील विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ मिलिंद राठोड यांनी या प्रसंगी दिली.
आयसीएआर, सिरकॉट, मुंबई येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ एन विघ्नेश्वरन यांनी कपाशीची वेचणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली तर बजाज कृषि महाविद्यालय येथील प्राचार्या डॉ स्नेहल देशमुख यांनी अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या त्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयोगी ठरतील असे सांगीतले.
      या अभियानामध्ये आयसीएआर, सिरकॉट, मुंबई येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विष्णू अरुडे, डॉ एन विघ्नेश्वरण, डॉ अर्पूत राज, डॉ शेषराव कौटकर, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील डॉ. रुपेश झाडोदे, डॉ प्रेरणा धुमाळ, डॉ सविता पवार, डॉ सचिन मूळे, डॉ निलेश वझीरे, श्री गजानन म्हसाळ, बजाज कृषि महाविद्यालय येथील डॉ. राजेंद्र खर्चे, डॉ विकास किरणापुरे, डॉ अर्चना अंबुले, डॉ मंगेश घोडे, डॉ कविता चोपडे, श्री भूषण भोयर, श्री वैभव गिरी, तसेच माफसू विद्यापीठ, नागपूर  येथील डॉ. चेतक पंचभाई, डॉ प्रतिभा जुमडे, डॉ अलका सावरकर, डॉ प्रशांत सोनकुसळे, डॉ महेश जावळे यांनी सुधारित तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 अशा कृषि संलग्नित विविध विभागातील शास्त्रज्ञांच्या टीमने प्रत्येक तालुक्यातील बारा गावांमधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा शंकांचे निरसन केले. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शेती पद्धती, माती परीक्षण, सॊयबिन,तूर,कपाशी पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, गुलाबी बोण्ड अळी व्यवस्थापन, बीबीएफ लागवड, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मशरूम उत्पादन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावागावांमध्ये कृषि जागरूकता रथ फिरविण्यात आला. या दरम्यान ड्रोन फवारणी तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया चे प्रात्याक्षिक करून दाखविले.
सदर अभियाना दरम्यान वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सहाययक कृषि अधिकारी, आत्मा विभागाचे चे सर्व बीटीएम, कृषिसखी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या अभियानाचा खरीप हंगामात शेती उत्पादन वाढविण्यासाठी फायदा होईल असा अभिप्राय शेतकऱ्यांनी नोंदविला. वर्धा जिल्ह्यातील सदर अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथिल वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा च्या राणी गायकवाड यांनी भूमिका निभावली तसेच अभियानाचे नियोजन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सरपंच श्री विनोद दांदळे, पोलीस पाटील श्री सचिन वडतकर, तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाचे विद्यार्थी पवन, लक्ष्मीनारायण, कृनाल, सात्विक व ग्रामस्थांनी योगदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *