बीबीएफ देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम

शेतकरी वापरत असलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल गरजेचा असल्या कारणाने नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत रुंद वरंबा व सरी म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचेल व उत्पन्न वाढेल, याकरिता प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांनी केले.  इतर पिकांसोबत चिया या तृणधान्य पिकाचा देखील समावेश शेतीमध्ये करावा. तसेच जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे यानुषंगाने  रेशीम उद्योग उभारणीवर भर द्यावा. असे मार्गदर्शन मा. जिल्हाधिकारी यांनी उदघाटन प्रसंगी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य आधारित प्रशिक्षण बीबीएफ देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांनी केले. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रभाकर शिवणकर व महिंद्रा कंपनीचे प्रबंधक डॉ. गौरव वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी भूषविले. 

बीबीएफ पेरणी यंत्र हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जाऊ शकतात. कृषि विभागाद्वारे बीबीएफ यंत्राकरीता अनुदान मिळणार असून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा संयुक्ताने  बीबीएफ तंत्रज्ञान या विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन श्री. प्रभाकर शिवणकर यांनी केले. शेती प्रगत करण्यासाठी रुंद वरंबा व सरी यंत्र व त्याद्वारे पेरणी महत्वाची ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे पाण्याची कमतरता होऊन उत्पादनामध्ये घट होऊ शकते. यावर उपाय म्हणून बीबीएफ चा वापर करावा. तसेच जास्त पाणी जमिनीत मुरावे व अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे याकरिता बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. अशी माहिती डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्ताविक करताना दिली. तांत्रिक सत्रादरम्यान कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी पद्धती व त्याचे फायदे सांगून प्रक्षेत्रावर बीबीएफ यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच बीबीएफ द्वारे पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे किती आवश्यक आहे याबद्दल  माती परीक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. गजानन म्हसाळ यांनी माहिती दिली.

यादरम्यान पूर्वीपासून बीबीएफ यंत्राचा वापर करणारे   कृविके दत्तक गाव खापरी, सेलू येथील शेतकरी श्री. सुरेश गव्हाळे, वर्धा जिल्ह्यातील महिला शेतकरी सौ. प्रीती चौधरी, सौ. वैशाली पुरी, श्री. भीमराव खोडे  यांनी मा. जिल्हाधिकारी यांना त्याचे अनुभव कथन केले व पेरणीसाठी किती कमी बियाणे लागले व उत्पन्न किती पटीने जास्त प्राप्त झाले याबद्दल सत्य उदाहरणे इतर शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन ठरले. या प्रसंगी धानोरा येथील श्री. उल्हास जैन यांनी चिया सिड या पिकाची पेरणी ते विक्री व्यवस्थापन याबद्दल विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. यादरम्यान शेतकरी तसेच कृषि व संलग्न विभागातील अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने  उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी केले. सदर कार्यकमाकरिता डॉ. निलेश वझीरे, डॉ. प्रेरणा धुमाळ, कु. पायल उजाडे, श्री. किशोर सोळंके, कु. वैशाली सावके, श्री. समीर  शेख, श्री. दिनेश चराटे, श्री. गजेंद्र मानकर, श्री. वसीम खान यांनी योगदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *